
मुंबई :
‘मिशन मेरिट’ उपक्रम अंतर्गत मुंबई महानगरपालिका व खान अकॅडमी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी “गणित गुरुवार” हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून महानगरपालिकेच्या सर्व शाळांतील इयत्ता ६ वी ते १० वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी प्रत्येक गुरुवारी रात्री ८ ते १० वाजेदरम्यान किमान ३० मिनिटे खान अकॅडमी या डिजिटल प्लॅटफॉर्मवर गणिताचा सराव करतील. विद्यार्थ्यांनी गणित विषयात शिस्त, सातत्य आणि प्रावीण्य मिळवावे, यासाठी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर यांच्या सूचनेनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांसाठी विविध अभिनव उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतात.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन स्पर्धेच्या युगात महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी यशस्वी व्हावेत, यासाठी महानगरपालिका शिक्षण विभाग सातत्याने प्रयत्न करीत असतो. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ‘गणित गुरुवार’ हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
‘गणित गुरुवार’चा फायदा
गणिताच्या नियमित सरावातून प्रावीण्य निर्माण होते. या विषयाबाबत आंतरराष्ट्रीय संशोधन व खान अकॅडेमीच्या आकडेवारीनुसार, आठवड्यातील किमान ३० मिनिटे सरावामुळे विद्यार्थ्यांमध्ये लक्षणीय शैक्षणिक प्रगती होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेतच नव्हे तर घरीही अभ्यासाची सवय निर्माण होईल.
विद्यार्थी-पालकांचा सहभाग
पालक-शिक्षक सभा (PTM), व्हॉट्सऍप ग्रुप व शिक्षक-पालक संवादामुळे हा उपक्रम शालेय वेळेनंतरही प्रभावी होणार आहे आणि प्रत्येक घरात शिक्षणासाठी पूरक वातावरण निर्माण होणार आहे.
अशी होणार ‘गणित गुरुवार’ उपक्रमाची अंमलबजावणी
प्रत्येक गुरुवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील शिक्षक इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आठवण करून देतील की, त्यांनी खान अकॅडमी प्लॅटफॉर्मवर लॉग इन करून गणिताचा सराव आणि असाइनमेंट पूर्ण कराव्यात. खान अकॅडमी प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी घालवलेला वेळ व त्यांनी सराव केलेल्या कौशल्यांची नोंद केली जाईल. शिक्षण विभागामार्फत सर्व शाळांमध्ये याबाबत पाठपुरावा केला जाईल.
राज्यात नवीन शैक्षणिक वर्षाची सोमवारपासून सुरुवात
हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाचा सातत्याने अभ्यास करण्याची गोडी निर्माण करणारा असेल. शिक्षक व पालक यांनाही विद्यार्थ्यांना समर्थपणे साथ देण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक आठवड्याला केलेल्या सरावामुळे विद्यार्थ्यांमधील गणिताची भीती दूर होऊन आत्मविश्वास निर्माण होईल, असे उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर यांनी सांगितले.