
मुंबई :
शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेमध्ये जाण्यासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांचे सोमवारी पर्जन्यवृष्टीसोबत पुष्पवृष्टीने ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. सकाळ व दुपार अशा दोन्ही सत्रांमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना चॉकलेट देऊन स्वागत केले. त्याचबरोबर अनेक शाळांमध्ये लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक, शाळा समिती सदस्य विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.
सोमवारी सकाळपासून पावसाने लावलेल्या हजेरीमुळे उन्हाळी सुट्टीनंतर शाळेत जाण्यासाठी उत्सुक असलेल्या मुलांचा काहीसा हिरमोड झाला. मात्र शाळेचा पहिला दिवस असल्याने पालकांनी सोमवारी कामावर सुट्टी घेत विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी आले होते. विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात प्रवेश करताचा त्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला. त्यानंतर शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या चरणी नतमस्तक होत त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांना गुलाबाचे फुल आणि चॉकलेट देत ढोल – ताशांच्या गजरात वर्गामध्ये नेण्यात आले. यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश, शालोपयोगी पुस्तकांचे २६ वस्तूंचे वाटप करण्यात आले. तर खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
लोकप्रतिनिधींना एकाचवेळी आपल्या परिसरातील सर्व शाळांमध्ये जाणे शक्य नसल्याने त्यांनी काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी हजेरी लावली तर काही शाळांमध्ये ठरावीक वेळानंतर हजेरी लावली. त्यामुळे सकाळच्या सत्राबरोबरच दुपारच्या सत्रामधील विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी लोकप्रतिनिधी उपस्थित राहू शकले. लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मुंबईतील खाजगी अनुदानित तसेच विनाअनुदानित अशा तब्बल १ हजार ६५८ शाळा तसेच उपनगरातील २ हजार ४४४ शाळांमध्ये प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. शाळा भरल्यानंतर कुठल्याही पालकांनी थांबू नये अशा सूचना शाळांतील शिक्षक, शिक्षिका देत होत्या तरीही अनेकजण शाळेच्या प्रवेशद्वारावरच शाळेची पहिली घंटा होईपर्यंत रेंगाळत होते. शाळेतील वातावरण पाहून विद्यार्थी भारावून गेले होते. शाळांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमुळे मुलांनी शाळेचा पहिला दिवस धमाल करत आनंदाने घालवला.
माध्यान्ह भोजनात शिरा देत केले तोंड गोड
शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनेनुसार शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मधल्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांचे तोंड गोड करण्यासाठी शिरा देण्यात आला होता. तर काही शाळांमध्ये मिठाई वाटण्यात आली. त्यामुळे शाळेचा पहिला दिवस खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांसाठी गोड ठरला.