
मुंबई :
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील मौजे साखर सुतारवाडी गावात २२ जुलै २०२१ रोजी अतिवृष्टी होवून नुकसान झाले होते. गावाच्या पुनर्वसनासाठी नागरी सुविधांची कामे करण्यात आली आहेत. ग्रामस्थांच्या घरांसाठी वाढीव रक्कम देण्याविषयी प्रस्ताव सादर करावा. मौजे साखर सुतारवाडी गावचे पुनर्वसन दर्जेदार पद्धतीने करण्यात यावे, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिले.
मंत्रालयात साखर सुतारवाडी गावाच्या पुनर्वसनाबाबत बैठक झाली. बैठकीस खासदार सुनील तटकरे, सहसचिव (मदत) संजय इंगळे, अवर सचिव बाळासाहेब हजारे उपस्थित होते, तर दूरदृष्यप्रणालीद्वारे रायगड जिल्हाधिकारी किसन जवळे उपस्थित होते. मदत व पुनर्वसन मंत्री पाटील म्हणाले, पुनर्वसन करताना ४ टक्के निधी हा राज्य व्यवस्थापन कक्ष, गृहनिर्माण यांना द्यावा लागतो. या निधीबाबत फेरविचार करावा. पुनर्वसन करताना निधी द्यावा लागू नये. टाटा ट्रस्ट, कोटक बँक यांना पत्र पाठवून घरे बांधण्याची विनंती करण्यात यईल. तसेच इर्शाळवाडीच्या धर्तीवर सुतारवाडीचे पुनर्वसन सिडकोकडून करण्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र द्यावे.
जिल्हा प्रशासनाने मौजे साखरवाडी येथे भेट देवून पुनर्वसन तातडीने कसे पूर्ण करता येईल, याबाबत कार्यवाही करावी. जोपर्यंत शासनाकडून ग्रामस्थांची कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत शासनाच्यावतीने पुनर्वसन करण्याबाबत नियमानुसार कार्यवाही करावी. तात्पुरत्या निवासाची व्यवस्था असणारे निवारे चांगले असावे. कामाचा दर्जा उत्तम असावा. कुठलीही आपत्ती येण्यापूर्वी प्रशासनाने सजग राहून उपाययोजना कराव्यात, असेही मदत व पुनर्वसन मंत्री पाटील म्हणाले.