शिक्षण

CBSE : यंदापासून सीबीएसई दहावीची परीक्षा वर्षातून दोन वेळा

सीबीएसई बोर्डाचा निर्णय जाहीर

मुंबई :

केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाने (सीबीएसई) दहावीची परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला. या निर्णयानुसार परीक्षा फेब्रुवारी व मे या दोन महिन्यांमध्ये हाेणार आहे. फेब्रुवारीमध्ये होणारी परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असणार असेल, तसेच फेब्रुवारीमधील परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे गुण सुधारायचे असतील त्यांना मे महिन्यामध्ये होणारी परीक्षा देणे आवश्यक असणार आहे. या निर्णयाची अमलबजावणी २०२६ पासून करण्यात येणार आहे.

सीबीएसईकडून दहावीची परीक्षा वर्षातून दोनवेळा घेण्यात येणार असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी सीबीएसईने परिपत्रक जाहीर करत २०२६ या शैक्षणिक वर्षापासून एका शैक्षणिक वर्षात दोन वेळा परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला. यामध्ये परीक्षा घेण्यात येणारा कालावधी, परीक्षेचे नियम, परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचा कालावधी या बाबी स्पष्टपणे जाहीर केल्या आहेत. विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी व्हावा, त्यांना कामगिरी सुधारण्यासाठी संधी मिळावी आणि कोचिंग संस्कृती कमी व्हावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. सीबीएसईच्या या नव्या निर्णयानुसार २०२६ या शैक्षणिक वर्षामध्ये पहिली परीक्षा फेब्रुवारीच्या मध्यामध्ये घेऊन त्याचा निकाल एप्रिलमध्ये जाहीर करण्यात येणार आहे. तर दुसरी परीक्षा मे महिन्यामध्ये घेऊन त्याचा निकाल जूनमध्ये जाहीर करण्यात येणार आहे. दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी फेब्रुवारीमध्ये होणारी परीक्षा अनिवार्य असणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र आणि भाषा यापैकी कोणत्याही तीन विषयांमध्ये आपले गुण सुधारण्याची संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे पहिल्या परीक्षेत तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मे महिन्यांमध्ये होणारी दुसरी परीक्षा देता येणार नाही. तसेच विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन हे फक्त मुख्य परीक्षेपूर्वीच एकदाच होणार आहे. या विद्यार्थ्यांना पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणारी परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामुळे मे महिन्यांमधील परीक्षा दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी गुण सुधारण्याची संधी असेल.

खेळाडूंसाठी खास सवलत

राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर शाळेचे किंवा देशाचे नेतृत्त्व करणाऱ्या खेळाडूंसाठी सीबीएसईने खास सवलत जाहीर केली आहे. परीक्षेदरम्यान राष्ट्रीय किंवा आंततराष्ट्रीय स्पर्धा आल्यास खेळाडू दोनपैकी कोणत्याही एका परीक्षेची निवड करू शकतील. त्यासाठी त्यांना ग्राह्य पुरावा किंवा प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार तात्पुरता अकरावी प्रवेश

फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या मुख्य परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना सीबीएसई मंडळाच्या अकरावी प्रवेशासाठी तात्पुरता प्रवेश देण्यात येणार आहे. मे महिन्यामध्ये होणाऱ्या दुसऱ्या परीक्षेच्या निकालानंतर त्या विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *