शिक्षण

Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

मुंबई :

मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या विविध विद्याशाखेअंतर्गत होणाऱ्या परीक्षांच्या तारखा विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत पदवी स्तरावरील तृतीय वर्ष बीकॉम, बीकॉम फायनान्शिअल मार्केट, बँकिंग अँड इन्श्युअरन्स, अकाऊंटींग अँड फायनान्स, इन्वेस्टमेंट मॅनेजमेंट, फायनान्शिअल मॅनेजमेंट, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट, आणि बीएमएस सत्र ५ च्या परीक्षा ७ ऑक्टोबर २०२५ पासून आयोजित केल्या जाणार आहे. या परीक्षांसाठी महाविद्यालयाने विद्यापीठाकडे अर्ज दाखल करण्याचा कालावधी हा १५ जुलै ते ३० ऑगस्ट २०२५ असा निश्चित करण्यात आला आहे.

विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेअंतर्गत तृतीय वर्ष सत्र ५ बीएस्सी, बीएस्सी कम्प्युटर सायन्स, बायोटेक्नॉलॉजी, आयटी, डेटा सायन्स या परीक्षा १४ ऑक्टोबर पासून घेण्यात येणार आहेत. या परीक्षांचे अर्ज महाविद्यालयाने विद्यापीठाकडे १५ जुलै ते ०८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत जमा करायचे आहेत. मानव्यविज्ञान विद्याशाखेअंतर्गत तृतीय वर्ष बीए आणि बीएमएमसी सत्र ५ च्या परीक्षा १४ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होणार आहेत. या परीक्षांचे अर्ज १५ जुलै ते ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत महाविद्यालयात जमा करायचे आहेत. त्याचबरोबर एलएलबी सत्र ५ (तीन वर्षीय) आणि एलएलबी सत्र ९ (पाच वर्षीय) या परीक्षा ३ डिसेंबर २०२५ पासून नियोजित करण्यात आल्या आहेत. या परीक्षांचे अर्ज १ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत महाविद्यालयामार्फत विद्यापीठाकडे जमा करायचे आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेतील एमसीए सत्र १ ची परीक्षा १० नोव्हेंबर आणि एमसीए सत्र ३ ची परीक्षा २ डिसेंबर २०२५ पासून नियोजित करण्यात आल्या आहेत. तसेच पदव्युत्तर स्तरावरील विविध परीक्षांच्या तारखा विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आल्या आहेत.

यासह इतरही सर्व परीक्षांचा तपशील मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील https://mu.ac.in/wp-content/uploads/2025/06/Exam-Submission-Form.pdf या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्व संबंधित महाविद्यालये आणि विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभागांनी मुंबई विद्यापीठामार्फत निर्गमित केलेल्या परिपत्रकाचे पालन करून तथा विद्यार्थ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी विहित मुदतीत विद्यार्थ्यांचे अर्ज विद्यापीठाकडे सादर करण्याचे आवाहन संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. पूजा रौंदळे यांनी केले आहे. विहीत मुदतीतनंतर कोणत्याही विद्यार्थ्यांना परीक्षेचा अर्ज भरता येणार नसल्याची बाब सर्व संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणू द्यावी तसेच परीक्षा अर्ज भरताना आणि निकाल जाहीर करताना एबीसीआयडी आवश्यक असल्याने सर्व विद्यार्थ्यांनी अपार आयडी तयार करण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे. परीक्षा विभागाचे उपकुलसचिव नरेंद्र खलाने आणि त्यांच्या चमूने या परीक्षांचे नियोजन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *