
मुंबई :
गिरणी कामगारांना वांगणी, शेलू येथील घरे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाला विरोध करून मुंबईतच गिरणी कामगारांना घरे देण्यात यावीत, या प्रमुख मागणीसाठी गिरणी कामगार संयुक्त लढा समितीमार्फत ९ जुलै रोजी राणी बाग ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढण्याचा निर्धार संघटनांनी केला आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत या मोर्चाची घोषणा करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय मिल मजदूर संघ, मुंबईचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते, सर्व श्रमिक संघटनेचे कॉ.बी.के.आंब्रे, कॉ. विजय कुलकर्णी, गिरणी कामगार सेनेचे अध्यक्ष सत्यवान उभे आणि सरचिटणीस बाळ खवणेकर उपस्थित होते.
युती सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरासाठी एकही वीट रचली गेली नाही. केवळ यापूर्वी बांधलेल्या घरांचे चावी वाटप करण्यात आले. २५ एप्रिल २०२५ रोजी सह्याद्री अतिथिगृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामगार संघटना आणि संबंधितांच्या बोलाविलेल्या बैठकीत १० ते १२ कामगार संघटनांनी मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत अशी जोरदार मागणी केली होती. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरणी कामगारांसाठी मुंबईत उपलब्ध होणाऱ्या जागेसंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी तातडीने बैठक बोलावण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र यानंतर आजवर या आश्वासनाचा सरकारला विसर पडलेला दिसत असल्याचा आरोप गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी केला आहे.
गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळावे अशी कामगार संघटनांची मागणी आहे. या नंतरही सरकारने वांगणी, शेलू येथील घरे गिरणी कामगारांना देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला संघटनांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे गिरणी कामगार संघटना, राजकीय पक्षांचा ९ जुलैला धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा अहिर यांनी दिला. या मोर्चाच्या परवानगीसाठी पत्र पोलिसांना देण्यात आले आहे. तसेच विविध राजकीय पक्षांचा नेत्यांना या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे अहिर यांनी सांगितले.