
मुंबई :
मध्य रेल्वे मार्गावरील उपनगरी, मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी असलेली साखळी खेचण्याच्या प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. १ ते १९ जून या कलावधीत मध्य रेल्वे मार्गावरील १५० गाड्यांची साखळी खेचल्याचे प्रकार घडले. यामुळे गाड्यांचे वेळापत्रक बिघडू लागले आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा या घटनांमध्ये तब्बल ५३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
उपनगरीय आणि मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी उद्भवल्यास याची सूचना मोटरमनपर्यंत पोचविण्यासाठी आणि गाडी थांबविण्यासाठी साखळी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र या सुविधेचा गैरवापर होऊ लागला आहे. प्रवासी अनेक वेळा चुकीच्या व विविध कारणांसाठी साखळी खेचत आहेत. चुकीच्या कारणांसाठी साखळी खेचल्यास प्रवाशांवर कारवाई करण्यात येते. मात्र याचा फटका केवळ संबंधित गाडीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसोबतच इतर गाड्यांनाही बसत आहे. यामुळे गाड्यांचा दहा ते पंधरा मिनिटे खोळंबा होतो.
हेही वाचा : Mill workers : ९ जुलैला धडक मोर्चा; शेलू, वांगणीतील घरांऐवजी मुंबईतच घरे द्या
मध्य रेल्वे मार्गावर १ ते १६ जून या कालावधीत १५० गाड्यांना साखळी खेचल्यामुळे १० ते १५ मिनिटे उशीर झाला. तर गेल्या वर्षी याच कालावधीत ९८ गाड्यांना उशीर झाला होता. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत या घटनांमध्ये तब्बल ५३ टक्के वाढ झाली आहे. भुसावळ विभागात १ ते १६ जून या कालावधीत २६ प्रकरणांमुळे गाड्यांना विलंब झाला. नागपूर विभागात ५२ प्रकरणांमुळे तर मुंबई विभागात १ ते १९ जून या कलावधीत ५७ प्रकरणांमुळे गाड्यांना विलंब झाला आहे.
या कारणांमुळे होतो गुन्हा दाखल
चुकून चेन ओढणे, प्रवासी वेळेत ट्रेनमध्ये चढू न शकल्यामुळे चेन ओढणे, मोबाईल फोन खाली पडणे किंवा इतर किरकोळ स्वरूपाची कारणे.