
मुंबई :
गणेशोत्सवात सोडण्यात येणाऱ्या सावंतवाडी, मडगाव व त्यापुढे जाणाऱ्या गाड्यांमध्ये रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, महाड, माणगाव, रोहा, पेण व अन्य स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जागा मिळवणे अत्यंत कठीण होते. या गाड्या आधीच भरलेल्या असतात. अनेकदा आरक्षण असणाऱ्या प्रवाशांनाही गाडीत चढता येत नाही. मोठ्या कष्टाने चढायला मिळालेच तर आपल्या जागेपर्यंत पोहोचता येत नाही. यामुळे अबालवृद्धांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. तिकीट तपासनीस, रेल्वे सुरक्षा बल यांचीही मदत वेळेवर मिळत नाही. कोकण रेल्वे व मध्य रेल्वेच्या हद्दीच्या वादात बऱ्याचदा चिपळूण व खेडला तक्रार केली तरी थेट पनवेलला तिकीट तपासनीस व पोलीस येतात. तोपर्यंत अर्धे प्रवासी उतरलेले असतात. त्यामुळे खेड, महाड, माणगाव येथील प्रवाशांमध्ये आरक्षण करूनही काही उपयोग होत नाही अशी भावना वाढीस लागली आहे.
रेल्वे प्रशासनातर्फे चिपळूण गाडी सोडताना पनवेलहून सोडली जाते. परंतु, मुंबईतील लालबाग, गिरगाव, परळ, माहीम, वरळी, अंधेरी, सांताक्रूझ, बोरिवली तर पुढे घाटकोपर, भांडुप, ठाणे, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, विरार, वसई, नालासोपारा येथील प्रवाशांना दिवा किंवा पनवेल स्थानके अजिबात सोयीची नाहीत. तसेच, लहान मुले, वृद्ध नागरिक यांना आणि बरेचसे सामान सोबत घेऊन दोन-तीन गाड्या बदलत प्रवास करण्यास सांगणे म्हणजे एकप्रकारची क्रूरता आहे असे आम्ही मानतो. म्हणूनच, खेड/चिपळूण सारख्या मुंबईपासून तुलनेने कमी अंतरावर असणाऱ्या स्थानकांपर्यंतच जाणाऱ्या गाडीला दादर आणि ठाणे हे थांबे आवश्यकच आहेत. पनवेल किंवा दिवा येथून चिपळूणकरिता सोडलेली गाडी “मुंबई” चिपळूण गाडीला पर्याय ठरू शकत नाहीत. मुंबईपासून कमाल २०० किलोमीटरच्या प्रवासासाठी ६० किलोमीटरवर पनवेलला गाडी बदलण्यास प्रवासी उत्सुक नसतात. तसेच रेल्वे सोडत असलेल्या दिवा चिपळूण किंवा पनवेल चिपळूण गाडीला एकही आरक्षित डबा नसल्यामुळे आरक्षण करून प्रवासाचे नियोजन करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना तो पर्यायच उपलब्ध नसतो. कुटुंबासह आणि सामान सोबत घेऊन जाणारे प्रवासी योग्य वेळेत आरक्षण करण्यास प्राधान्य देतात. परंतु तशी गाडीच उपलब्ध नसल्यामुळे आणि मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणे म्हणजे एक प्रकारची शिक्षाच असल्यामुळे त्यांना नाईलाजाने रेल्वेने अनारक्षित गाडीतून रेटारेटीचा प्रवास करावा लागतो.
हेही वाचा : Railway : मध्य रेल्वे मार्गावर साखळी खेचण्याच्या घटनांमध्ये वाढ
याकरिता, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/ दादर – ठाणे – पनवेल – पेण – नागोठणे – रोहा – कोलाड – इंदापूर – माणगाव – गोरेगाव रोड – वीर – सापे वामणे – करंजाडी – विन्हेरे – दिवाणखवटी – कळंबणी बुद्रुक – खेड – अंजनी असे थांबे घेऊन चिपळूणपर्यंतच जाऊन पुन्हा मुंबईला येणारी विशेष गाडी सुरू करण्याची विनंती कोंकण विकास समितीतर्फे रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे. ही गाडी विशेषतः रायगड (दक्षिण विभाग) व रत्नागिरी (उत्तर विभाग) जिल्ह्यातून मुंबईकडे येणारे विद्यार्थी, नोकरदार व पर्यटक यांना उपयुक्त ठरेल. तसेच, रत्नागिरी व सावंतवाडीकडे जाणाऱ्या गड्यांमधील गर्दी विभाजनासाठीही उत्तम उपाय ठरेल. त्यामुळे मध्य रेल्वे व कोकण रेल्वेच्या संयुक्त नियोजनांतर्गत सदर विशेष गाडी सुरू करण्यास लवकरात लवकर कार्यवाही करण्याची विनंतीही कोंकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जयवंत दरेकर व अक्षय महापदी यांनी केली आहे.
सुचविलेले वेळापत्रक
- मुंबईहून प्रस्थान : पहाटे ४:५० किंवा सकाळी ७:५०/८ वाजता मुंबईहून
- परतीचा प्रवास : चिपळूणहून दुपारी ३ नंतर
- डब्यांची रचना : सामान्य द्वितीय श्रेणी (अनारक्षित), द्वितीय श्रेणी आरक्षित (सिटिंग), वातानुकूलित चेअर कार (AC Chair Car)