
मुंबई :
कुर्ल्यातील महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) परिसरातील जंगल तोडून स्विमिंग पूल बांधत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केल्यानंतर कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “तिथे स्विमिंग पूल नव्हे, तर शिवकालीन पारंपरिक खेळांचं मैदान उभं राहत आहे. आदित्य ठाकरेंचा खरा उद्देश त्या परिसरातील रोहिंग्या-बांगलादेशींच्या अनधिकृत झोपड्यांना वाचवण्याचा आहे का?” असा सवाल मंत्री लोढा यांनी उपस्थित केला आहे.
कुर्ल्यातील आयटीआय परिसरात मागील दोन महिन्यांपासून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांच्या नावे एक पारंपरिक मराठमोळं खेळांचं मैदान तयार होत आहे. येत्या १३ ऑगस्टला त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य देशी आणि पारंपरिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन होणार आहे. आयटीआयच्या विद्यार्थ्यांना त्रास न होता, इतर खेळाडूंना प्रवेश मिळावा याकरिता मागील बाजूला पायवाट व द्वार बांधण्याचं काम सुरू झालं होतं. “या पायवाटेमुळे आयटीआयच्या बाहेरील बाजूला वाढलेल्या रोहिंग्या-बांगलादेशींच्या अनधिकृत झोपड्यांना अडथळा होईल ही भीती आदित्य ठाकरे यांना वाटत असावी.
हेही वाचा : Warkari : आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेमुळे वारकऱ्याचे वाचले प्राण
मुंबईत प्रथमच मराठमोळं पारंपरिक खेळांचं मैदान होत आहे, त्याचं स्वागत करण्याऐवजी, रोहिंग्या-बांगलादेशींच्या अनधिकृत झोपड्यांना वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न का?” असा रोखठोक प्रश्न लोढा यांनी यावेळी विचारला आहे.