
मुंबई :
भारतातील समृद्ध भाषिक वारशाचा अभ्यास, संशोधन आणि संवर्धनासाठी मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. मुंबई विद्यापीठात लवकरच ‘सेंटर ऑफ एक्सलेंस इन हेरिटेज लँग्वेजेस अँड मल्टी- कल्चरल स्टडीज’ची स्थापना केली जात आहे. भारतातील लुप्त होत चाललेल्या समृद्ध व ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या भाषा आणि सांस्कृतिक परंपरांच्या संशोधन, संवर्धन आणि प्रचारासाठी या केंद्राचे महत्व अधोरेखित होणार आहे.
मुंबई विद्यापीठात स्थापन करण्यात येणाऱ्या या केंद्रात प्रामुख्याने ‘अवेस्ता-पहलवी’, ‘पाली’ आणि ‘प्राकृत’ या प्राचीन आणि सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत मौल्यवान भाषांवर भर दिला जाणार आहे. या भाषांतील साहित्य, बहुमूल्य ग्रंथ, हस्तलिखिते आणि शिलालेखांचे संशोधन व जतन हे या केंद्राच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक आहे. या प्रस्तावित केंद्राच्या स्थापनेच्या अनुषंगाने आज विद्यापीठात ‘हेरिटेज लँग्वेजेस अँड कल्चर’ या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय परिसंवादासाठी मुख्य अतिथी म्हणून डॉ. चंद्रशेखर कुमार, सचिव, अल्पसंख्याक विकास मंत्रालय, भारत सरकार हे उपस्थित होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या परिसंवादासाठी राम सिंह, सहसचिव, अल्पसंख्याक मंत्रालय, श्रवण कुमार, उपसचिव, अल्पसंख्याक मंत्रालय, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि या केंद्राचे नोडल अधिकारी प्रा. शिवाजी सरगर यांच्यासह ‘अवेस्ता-पहलवी’, ‘पाली’ आणि ‘प्राकृत’ भाषेचे समन्वयक आणि अभ्यासक उपस्थित होते.
या परिसवादात उपस्थितांना संबोधित करताना डॉ. चंद्रशेखर कुमार म्हणाले भारतातील या प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भाषांचे महत्व सर्वसामान्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहचविण्यासाठी या केंद्राच्या माध्यमातून अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत चित्रफिती तयार करण्यात याव्यात. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या या पुढाकारामुळे देशातील अन्य विद्यापीठे या प्रकल्पाचे अनुकरण करतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सेंटर ऑफ एक्सलेंस इन हेरिटेज लँग्वेजेस अँड मल्टी-कल्चरल स्टडीज या केंद्राच्या स्थापनेमागील भूमिका विशद करताना सांगितले की, भारताला एक समृद्ध आणि ऐतिहासिक भाषिक वारसा लाभला आहे. या प्राचीन आणि ऐतिहासिक वारशाचा सखोल अभ्यास, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संवर्धन करून शाश्वतेच्या दृष्टीने विचार व्हावा यासाठी मुंबई विद्यापीठात हे केंद्र स्थापन केले जात आहे. हे केंद्र केवळ एक शैक्षणिक प्रकल्प न राहता, भारताच्या सांस्कृतिक पुनरुत्थानाचे प्रभावी माध्यम ठरेल असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. हे प्रस्तावित केंद्र ‘युगे युगेन भारत’, ‘ज्ञान भारतम्’ आणि ‘भारतीय भाषा संवर्धन योजना’ यांसारख्या राष्ट्रीय उपक्रमांशी समन्वय साधून कार्य करणार असून, हे केंद्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या उद्दिष्टांशी सुसंगत संशोधन, अभ्यासक्रम विकास, क्षेत्रीय सर्वेक्षण आणि डिजिटायझेशनच्या माध्यमातून भारतीय भाषांचा जागर घडवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा : Ganeshotsav : गणेश मंडळांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, उत्सव जोरदार साजरा करू – कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा
या एकदिवसीय परिसंवादाचे यशस्वी आयोजन या केंद्राचे नोडल अधिकारी प्रा. शिवाजी सरगर यांनी केले. या परिसंवादात भारतातील परंपरागत भाषा, त्यांचे लोप होणे आणि त्या जपण्यासाठी स्थानिक समुदायांची भूमिका व डिजिटल माध्यमांचा वापर यावर सादरीकरण करून सखोल चर्चा करण्यात आली.