शहर

मुंबईला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला

मुंबई : 

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी तानसा तलाव २३ जुलै २०२५ रोजी भरुन ओसंडून वाहू आगला. सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी हा तलाव ओसंडून वाहू लागला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयाचे’ ३ दरवाजे ७ जुलै २०२५ रोजी उघडण्‍यात आले आहेत. तर, ९ जुलै २०२५ रोजी मोडक सागर तलाव ओसंडून वाहू लागला होता. त्यापाठोपाठ आता तानसा तलाव देखील ओसंडून वाहू लागला आहे.

मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. आज सकाळी ६ वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार सर्व सातही तलावांमध्ये त्यांच्या एकूण क्षमतेच्या ८६.८८ टक्के इतका जलसाठा आहे.

तलावाची कमाल जलधारण क्षमता १४,५०८ कोटी लीटर

ठाणे जिल्‍ह्यातील शहापूर तालुक्‍यात तानसा धरण असून हे सर्वात जुन्या दगडी बांधांपैकी एक मानले जाते. आज ओसंडून वाहू लागलेल्या तानसा तलावाची कमाल जलधारण क्षमता ही १४,५०८ कोटी लीटर (१४५,०८० दशलक्ष लीटर) एवढी आहे. तानसा तलाव गतवर्षी दिनांक २४ जुलै २०२४ रोजी पहाटे ४.१६ वाजता २६ जुलै २०२३ रोजी पहाटे ४.३५ वाजता, तर वर्ष २०२२ मध्ये १४ जुलै रोजी रात्री ८.५० वाजता आणि २०२१ मध्ये २२ जुलै रोजी पहाटे ०५.४८ वाजता ओसंडून वाहू लागला होता. तर त्या आधीच्या वर्षी म्हणजेच २० ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ७.०५ वाजता पूर्ण भरुन वाहू लागला होता.

हेही वाचा : एसटीमध्ये दाखल झालेल्या बीएस ६ गाड्यांमधील ओडोमीटरमुळे जुनाट किलोमीटर मापन पद्धतीची पोलखोल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *