शहर

‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न लवकरच पूर्ण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण; कोस्टल रोड उद्या पासून २४ तास खुला

मुंबई :

काही वर्षांपूर्वी आपण ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ हे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारात असून वर्षाला किमान ५० किलोमीटरचे मेट्रो मार्ग पूर्ण होत आहेत. तसेच रस्त्यांचे जाळे चांगल्या प्रकारे उभारले जात असून वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका करणाऱ्या दोन महत्त्वाच्या लिंक पुलांचे लोकार्पण करण्यात आले आहे. यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगर प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईकरांसाठी या प्रकल्पांचे लोकार्पण करताना आनंद होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

वांद्रे येथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पोडियम येथे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि बृहन्मुंबई महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण झाले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी उपस्थित होते.

कोस्टल रोड उद्या पासून २४ तास खुला

मुंबईतील कोस्टल रोड १५ ऑगस्टपासून नागरिकांसाठी २४ तास खुला असणार असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वाहनचालकांनी कोस्टल रोडवर वाहतूक नियमांचे पालन करावे, संपूर्ण कोस्टल रोड सीसीटीव्ही च्या निरिक्षणाखाली आहे. हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टिकोनातून क्रांतिकारी ठरणार आहे. यात पादचाऱ्यांसाठी प्रेक्षणीय असे वॉकिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक यांचा समावेश आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा : राज्यातील एक हजार आयटीआयमध्ये विभाजन विभीषिकेचे स्मरण; विद्यार्थ्यांनी एकात्मतेसह अखंडतेचा ध्यास धरावा – मंगलप्रभात लोढा

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी समांतर मार्ग तयार केले जात आहेत. मुंबईतील विविध भागांना जोडणारे टनेल्स, लिंक पूल आणि उड्डाणपूल हे वाहतूक सुलभीकरणासाठी उपयुक्त ठरणार आहेत. २०२८-२९ पर्यंत मुंबईत सुरू असलेले विकास प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट आहे. मुंबईचा विकास करत असताना तो पर्यावरणस्नेही असावा यासाठी आग्रही आहोत. पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून शाश्वत विकास करता येणार नाही. त्यामुळे विकास प्रकल्प राबवताना पर्यावरणाचा विचार प्रथम केला जात आहे. नव्याने उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पांसाठी परदेशातील तंत्रज्ञानांपेक्षा चांगल्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. लवकरच उपनगरीय रेल्वेतही मेट्रोसारखे वातानुकूलित, स्वयंचलित दरवाजे असलेले डबे उपलब्ध होतील. मेट्रो प्रकल्प केवळ वाहतूक सुधारण्यासाठी नसून, रोजगार निर्मितीचाही एक प्रभावी मार्ग आहे. कर्मचाऱ्यांना चांगले निवास व सुविधा दिल्यास त्यांची कार्यक्षमता वाढते. विकासात कोणतीही तडजोड न करता, मुंबईच्या प्रगतीचा वेग अधिक वाढवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवास सुकर होईल

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शहरात सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे नागरिकांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडत आहेत. मेट्रोचे जाळे ४५० किमीपेक्षा जास्त विस्तारले असून, त्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवास सुकर होईल. वाहतूक कोंडी कमी होईल, इंधनाची बचत होईल आणि वेळ वाचेल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मेट्रो आणि इतर प्रकल्प वेगाने राबवले जात आहेत. काही प्रकल्प नियोजित वेळेआधी पूर्ण झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, मुंबईच्या प्रगतीचा वेग देशाच्या विकासासाठी अनिवार्य आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने तिच्या सर्वांगीण विकासासाठी विकास कामे केली जात आहेत. सार्वजनिक सुरक्षितता आणि दर्जेदार पायाभूत सुविधा यासाठी शासन कटिबद्ध आहे.

विविध प्रकल्पांचे लोकर्पण

मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने मंडळे येथे उभारलेल्या ७० कोटी रुपयांच्या मेट्रो प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रशिक्षण संस्थेमुळे मेट्रो साठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार असून प्रशिक्षणासाठीचा खर्च वाचणार आहे. तर इतर राज्यातील मेट्रो प्रकल्पासाठीचे मनुष्यबळ प्रशिक्षित करून महसूल मिळणार आहे. तसेच चेंबूर – सांताक्रुझ लिंक केबल स्टेड पूल, रोड भाग 1 हा अशिया खंडातील 100 मीटर त्रिज्येचा सर्वात मोठा वक्राकार केबल स्टेड पूल आहे. तसेच 90 कोटी रुपयांच्या मालवणी येथील कर्मचारी निवासस्थान इमारत ज्यामध्ये एकूण 156 सदनिका असणाऱ्या दोन इमारती आहेत. कलानगर जंक्शन येथील आर्म डी उड्डाणपूल तसेच धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा रस्त्यावरील 5.25 कि.मी लांबीच्या विहार क्षेत्र, पादचारी भुयारी मार्गाचे लोकार्पण करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *