
मुंबई :
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी विहार तलाव आज (दिनांक १८ ऑगस्ट २०२५) दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी ओसंडून वाहू लागला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे. यंदाच्या पावसाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी ६ तलाव आतापर्यंत भरुन ओसंडून वाहिले आहेत. मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे.
आज दुपारी ओसंडून वाहू लागलेल्या विहार तलावाची कमाल जलधारण क्षमता ही २,७६९.८ कोटी लीटर (२७,६९८ दशलक्ष लीटर) एवढी आहे. हा तलाव गत वर्षी म्हणजे दिनांक २५ जुलै २०२४ रोजी मध्यरात्री ३.५० वाजता, सन २०२३ मध्ये २६ जुलै रोजी रात्री १२.४८ वाजता, सन २०२२ मध्ये ११ ऑगस्ट रोजी आणि सन २०२१ मध्ये १८ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता.
हेही वाचा : मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूरला पुढील २४ तासासाठी रेड अलर्ट
मुंबईला पाणीपुरवठा करणा-या ७ धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी आहे. आज पहाटे ६ वाजताच्या मोजणीनुसार सर्व ७ तलावांमध्ये मिळून १३१९६४.० कोटी लीटर (१३१,९६४ दशलक्ष लीटर) इतका जलसाठा उपलब्ध आहे. हा जलसाठा एकूण जलसाठ्याच्या अर्थात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटरच्या तुलनेत ९१.१८ टक्के इतका आहे.