
मुंबई :
मुंबईत मागील ६ तासांत २०० मिलामीटर आणि २४ तासांत ३५० मिलीमीटर पाऊस झाला आहे. ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने सखल भागात पाणी साचले असून पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेचे ५२५ पंप कार्यान्वित आहेत. पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप वाढवण्याचे निर्देश देण्यात आल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री व मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मंगळवारी मुंबई महापालिकेतील आपत्कालीन कक्षास भेट देऊन शहर आणि उपनगरातील पावसाचा आढावा घेतला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर उपस्थित होते.
तत्पूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिठी नदीची पाहणी केली तसेच कुर्ला येथील क्रांतीनगर व विक्रोळी पार्कसाईट येथील दरडप्रवण क्षेत्राची पाहणी केली. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मिठी नदीची पाण्याची पातळी ३.९ मीटरपर्यंत वाढली आहे, त्यामुळे कुर्ल्याच्या क्रांतीनगरमध्ये पाणी शिरले. येथील जवळपास ३५० लोकांना महापालिकेने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. या ठिकाणी रहिवाशांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून वैद्यकीय अधिकारी देखील उपस्थित आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुंबईत ६ मुख्य पंपिंग स्टेशन्स आणि १० मिनी पंपिंग स्टेशन्स आणि ५२५ पंप कार्यरत आहेत. ६ तासांत २०० मिलामीटर आणि २४ तासांत ३५० मिलीमीटर पाऊस झाला. कमी वेळात जास्त पाऊस म्हणजे ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने मुंबईतील सखल भागात पाणी साचले. सगळीकडे यंत्रणा सज्ज असून पालिकेचे अधिकारी प्रत्यक्ष फिल्डवर काम करत आहेत, असे ते म्हणाले. घाटकोपर, मुंब्रा आणि विक्रोळी पार्कसाईट येथे जिओ नेटिंगचे काम करण्यात आले आहे. दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांचे कायम स्वरुपी पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा : Mumbai Rain : पावसाने घेतला माय लेकाचा बळी.. मुंबई हळहळली
मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता शहर आणि उपनगरातील पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढवावी लागले. यासाठी महापालिका नियोजन करत आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मध्य रेल्वेची उपनगरीय रेल्वे सेवा बंद असली तर बेस्टकडून प्रवाशांसाठी जादा बसेस सोडण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंfदे यांनी दिली.
मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली. यावेळी त्यांनी राज्यभरातील पावसाचा आढावा घेतला.