
मुंबई :
रोजच्या वाढणाऱ्या ऑनलाईन ऑफलाईन अशैक्षणिक कामांमुळे (Teaching Crisis) शिक्षक आपलं जगणंच हरवून बसल्याची खंत शिक्षक नेते मुंबई मराठी अध्यापक संघांचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी व्यक्त केली.
१ जून जन्मतारीख असलेल्या अनेक शाळांमधील शिक्षक सेवानिवृत्त होत असून त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यांना उपस्थित राहून त्यांनी खंत व्यक्त केली.
दैनंदिन अध्यापन करीत असतांना शिक्षक आपल्या विषयाबाबत सजग राहून अनेक संदर्भ तसेच अवांतर पुस्तकं वाचून चिंतन करीत असत. याचा फायदा प्रभावी अध्यापनासाठी होत असे, परंतु आता वाढत्या अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांना वेळच मिळत नसून अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकाचा कारकून झाला असल्याची खंत ही व्यक्त करून शिक्षकांचे अशैक्षणिक कामे बंद करावेत अशीही मागणी अनिल बोरनारे यांनी केली.
आज आता ताबडतोब अशा आशयाचे संदेश शाळांच्या ग्रुपवर शिक्षण विभागाकडून टाकून विविध प्रकारची माहिती मागितली जाते. यातच शिक्षकांचा अर्धा वेळ जात असतो.
प्रत्यक्ष निवडणूकीची कामे, दशवार्षिक जनगणना व आपत्कालीन व्यवस्थापनाची कामे वगळता शिक्षकांना अन्य कामे देऊ नये असं “राईट टू एज्युकेशन” कायद्यात असल्यावर सुद्धा अधिकाऱ्यांकडून या कायद्याची पायमल्ली होत असल्याचाही आरोप बोरनारे यांनी केला आहे.
ठाणे जिल्ह्यातील अनेक शिक्षकांना मे महिन्याची सुट्टी जाहीर होताच बीएलओ च्या कामाला जुंपले आहे.