
मुंबई :
गेली अनेक वर्षे आर्थिक संकटात सापडलेल्या एसटीच्या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका काढण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल एसटीचे अध्यक्ष व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा सातारी कंदी पेढ्याचा हार व शिवनेरीची प्रतिकृती भेट देऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने मुंबई सेंट्रल येथील एसटीच्या मुख्यालयात ’महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस’च्यावतीने सत्कार करण्यात आला.
एसटी आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली असून दहा हजार कोटी रुपयांचा संचित तोटा व सात हजार कोटी रुपयांची देणी थकली असून त्यातून निश्चित मार्ग काढण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित होती. या मागणीला यश मिळाले असून एसटीच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. गोरगरिबांची व सामान्यांची एसटी सक्षम करायची असेल तर त्यावर मार्ग काढण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय हा योग्यच आहे. यातून अपेक्षित यश मिळून एसटीचे प्रवासी व कर्मचारी या दोघांचे प्रश्न सुटतील असा विश्वास एसटी कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला. एसटीत सर्वात यशस्वी ठरलेल्या ‘शिवनेरी’ बसची प्रतिकृती व एसटीच्या दृष्टीने पुढे सर्व काही गोड व्हावे यासाठी सातारी कंदी पेढ्याचा हार देऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने मंत्री प्रताप सरनाईक यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या सत्काराला उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित असलेला सात टक्के महागाई भत्ता तत्काळ देण्यात येणार आहे. त्यासाठी अपेक्षित उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट एसटी प्रशासनाला देण्यात येणार आहे. येत्या पाच वर्षात २५ हजार नव्या स्व:मालकीच्या बसेस खरेदी करण्यात येतील. या शिवाय या पुढे भाडे तत्वावरील एकही बस घेतली जाणार नसून पाच वर्षात एसटीला चांगले दिवस येतील, असा विश्वासही त्यांनी या वेळी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केला.
या वेळी भारतीय कर्मचारी कामगार महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप, संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे, कार्याध्यक्ष विजय बोरगमवार, कोशाध्यक्ष संतोष गायकवाड, उपाध्यक्ष वसंत बोराडे, संजीव चिकुर्डेकर, दीपक जगदाळे, प्रादेशिक सचिव बालाजी ढेपे, राजेश गोपनवार, समीर डांगे, मनीष बत्तुलवार, पदाधिकारी सचिन जगताप, राजेश सोलापान, मनीषा कालेशवार, संतोष भराड, संतोष भिसाडे, राजेंद्र वहाटूळे, बालाजी जाधव, अनिता वळवी, अरविंद निकम, सुधाकर कांबळे, संदीप गोसावी, सुमन ढेंबरे, धनंजय पाटील, सुगंधा हिले, विनोद दातार, जहीर खान, किशोर पाटील, सुनील घोरपडे, नवनाथ गुंड, हरीश बन्नगरे, जयंत मुळे, प्रवीण चरपे, संदीप मुळे,विष्णू म्हस्के, कमलाकर जोशी, जयश्री कंचकटले, विधी पवार, सोमनाथ पांढरे, किशोर सावंत, गजानन पूकळे, तुकाराम पुंगळे, प्रताप शेळके आदी पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.