
ठाणे
शतायुषी सेवाभावी श्री आनंद भारती समाज, ठाणे तर्फे यंदाच्या ११५ व्या गणेशोत्सवात शालांत ( इयत्ता दहावी) परीक्षेत गुणानुक्रमे ठाणे केंद्रात सर्वप्रथम येणाऱ्या उमेदवाराचा नाखवा परितोषिकांनी गौरव करण्यात येणार आहे. कोपरीच्या श्री माँ बाल निकेतन विद्यालयाची विद्यार्थीनी क्रिशा मनिषा विजय देवरे हिने ५००पैकी ४८८ गुण (९९.००%) संपादन केले आहेत. ती ७४ व्या कै यशवंत लक्ष्मण नाखवा स्मारक पारितोषिक व ३९ व्या कै विष्णू पांडू नाखवा परितोषिकांची मानकरी ठरली आहे, अशी माहिती संस्थेचे कार्यवाह संदीप कोळी यांनी दिली.
क्रिशाला शाळा शिक्षीका आई मनिषा, डॉक्टर असलेले वडील विजय व एम एस करत असलेली मोठी बहीण तन्वी यांचे मार्गदर्शन लाभले. संस्कृत विषयात झेलम इनामदार आणि इतर विषयात पद्मजा कुलकर्णी तिच्या मार्गदर्शिका होत्या. भविष्यात क्रिशाला कोअर कॉम्प्युटर सायन्स इंजिनियरिंगला जायचे असून सध्या तिने ठाण्यातील मो.ह. विद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आहे.
या धवल यशाबद्दल श्री आनंद भारती समाजाचे अध्यक्ष हरेश्वर मोरेकर, जेष्ठ सदस्य प्रल्हाद नाखवा यांनी क्रिशाचे अभिनंदन केले. प्रतिक्रिया व्यक्त करताना क्रिशा म्हणाली, स्वाध्यायाला पर्याय नाही. मो.ह.विद्यालयाचे प्राचार्य विकास पाटील म्हणाले, जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या सर्व शाळांमधून ठाण्यातील मो.ह. विद्यालयाचा निकाल सर्वाधिक ९७.६६% लागला आहे. क्रिशाचे मो.ह.विद्यालयात स्वागत करतो आणि भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देतो.
क्रिशाचे देवरे हिचे यश असे – एकूण गुण १०० पैकी, इंग्रजी – ९५,संस्कृत – ९९, गणित – ९८, विज्ञान -९८, समाजशास्त्र – ९८. ५०० पैकी ४८८ (मराठी -९१).