
मुंबई :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच घोषणा केली की महाराष्ट्र शासनाच्या वतीने डबेवाला कामगार यांना भिवंडी येथील दिवे अंजूर येथे घरे उपलब्ध करून दिली जातील. दिवे अंजूर ता. भिवंडी येथील घरे डबेवाला कामगार यांना गैरसोईची असणार आहेत, तसेच त्या घरांची किंमत २५ लाख रूपये ठेवली आहे. ही किंमत डबेवाला कामगाराला न परवडणारी आहे.
डबेवाला कामगार हा प्रामुख्याने MMRDA च्या परिक्षेत्रात रहातो, मग तो विरार, कल्याण, नवी मुंबई, वसई, ठाणे, डोंबिवली, बोरीवली. घाटकोपर, अंधेरी येथे प्रामुख्याने राहतो. महाराष्ट्र शासनाने डबेवाला कामगाराला दिवे अंजूर ता. भिवंडी येथे घरे दिल्यास विरार, बोरीवली, अंधेरी येथील डबेवाला कामगारासाठी ते गैरसोईचे होणार आहे. त्याचप्रमाणे विरार येथे महाराष्ट्र शासनाने घरे उपलब्ध करून दिल्यास ठाणे, डोंबिवली, घाटकोपर येथील डबेवाला कामगारांना ते गैरसोईचे होणार आह. त्यामुळे राज्य सरकारने म्हाडाच्या वतीने नव्याने बांधण्यात येणाऱ्या घरांच्या ठिकाणी ५ टक्के आरक्षण डबेवाला कामगारांना द्यावे. यामुळे डबेवाला कामगाराला काम करतो, त्या रेल्वे मार्गावर घर उपलब्ध होऊ शकते.
उदा बोरीवली, विरार येथे म्हाडा घरे बांधत असेल तर पश्चिम रेल्वे मार्गावर काम करणाऱ्या डबेवाला कामगार यांना ते घर सोईचे होईल. कल्याण, ठाणे येथे म्हाडा घरे बांधत असतील तर मध्य रेल्वे मार्गावर काम करणाऱ्या डबेवाला कामगार यांना ते सोईचे होईल. नवी मुंबई येथे सिडको घरे बांधत असतील तर हार्बर रेल्वे मार्गावर काम करणाऱ्या डबेवाला कामगार यांना ते सोईचे होईल, तेव्हा सरकारला “मुंबई डबेवाला असोशिएशन”ची विनंती आहे की म्हाडाच्या आणि सिडको यांचे वतीने नव्याने उभारण्यात येणाऱ्या घरांच्या सोडतीमध्ये ५ टक्के आरक्षण डबेवाला कामगार यांना द्यावे. यामुळे डबेवाला कामगाराला तो काम करतो त्या रेल्वे मार्गावर घर मिळेल
ज्या प्रमाणे गिरणी कामगाराला सरकारने मदत करून मुंबईत १० लाखात घर दिले आहे त्याच धर्तीवर मुंबई डबेवाला कामगार यांना मुंबईत १० लाखात घर द्यावे, अशी विनंतीही मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.