
मुंबई :
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आकाशाला गवसणी घालण्याची क्षमता आहे. आपण त्यांच्यातील क्षमता वेळीच ओळखून त्यांना सर्वसमावेशक शिक्षण द्यायला हवे. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात ‘मिशन २०२७’ चा समावेश करण्यात आला आहे. भारताच्या शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेल्या निपुण भारत अभियान (Nipun Bharat Mission) अंतर्गत सन २०२७ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता तपासण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांला या शैक्षणिक गुणवत्ता तपासणीसाठी सज्ज ठेवावे, असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी केले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाची सहविचार सभा भायखळा येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृह येथे आज (दिनांक १३ जून २०२५) पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. सैनी बोलत होते. उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुजाता खरे यांच्यासह उपशिक्षणाधिकारी, अधीक्षक, मुख्याध्यापक यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या सभेला उपस्थित होते. निपुण भारत अभियान (Nipun Bharat Mission) हे भारताच्या शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेले एक महत्त्वपूर्ण अभियान आहे. या अभियानाचा उद्देश प्रत्येक विद्यार्थ्याने तिसऱया इयत्तेपर्यंत मूलभूत साक्षरता (Basic Literacy) आणि अंकगणित (Numeracy) कौशल्ये प्राप्त करणे हा आहे, या अनुषंगाने सहविचार सभेत चर्चा करण्यात आली.
डॉ. सैनी म्हणाले, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला तो ज्या इयत्तेत शिकत आहे, त्या इयत्तेतील अभ्यास त्याला यायलाच हवा. यासाठी विद्यार्थ्यांचे पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान (FLN) कसे वाढेल, यावर भर द्यावा. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया त्या-त्या इयत्तेतच पक्का होणे आवश्यक आहे. यासाठी खान अकादमी, आसमान फाउंडेशन, मुक्तांगण इंडिया यासारख्या विविध स्वयंसेवी संस्था महानगरपालिकेला सहकार्य करीत आहेत. त्यांचे मार्गदर्शन घ्यावे, असे नमूद करुन विद्यार्थ्यांचे शिक्षकच नव्हे तर, पालक व्हा, असे भावनिक आवाहनही डॉ. सैनी यांनी मुख्याध्यापकांना केले.
उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर म्हणाल्या, महानगरपालिकेच्या शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल अतिशय उल्लेखनीय लागला आहे. यावर्षी देखील निकालाची टक्केवारी वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने भर द्यायला हवा. ज्या विद्यार्थ्यांना नववीत ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले असतील, अशा विद्यार्थ्यांची यावर्षापासून ‘स्कॉलर बॅच’ तयार करून दहावीसाठी त्यांची शैक्षणिक तयारी करून घेण्यात येणार आहे. तसेच यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून दर शनिवारी विद्यार्थ्यांना करियरसाठी मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे डॉ. जांभेकर यांनी सांगितले.
या सहविचार सभेत खान अकादमीचे अमर माळी, आसमान फाउंडेशनच्या अपूर्वा सावंत, मुक्तांगण इंडियाच्या मनाली सावंत यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱया शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुजाता खरे यांनी विविध शैक्षणिक उपक्रम, मिशन मेरिट आदींबाबत माहिती दिली. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ यांनी आभार मानले.