मुख्य बातम्याशहर

विक्रोळी उड्डाणपूल शनिवारी सायंकाळी ४ पासून वाहतुकीस होणार खुला

मुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्‍या निर्देशानुसार कोणत्‍याही औपचारिक समारंभाची वाट न पाहता पूल नागरिकांसाठी खुला करण्याचा निर्णय

मुंबई :

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱया विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे बांधकाम नियोजित कालावधीत पूर्ण केल्‍याबद्दल मुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचे अभिनंदन केले आहे. तसेच, पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता, तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने कोणत्‍याही औपचारिक समारंभाची वाट न पाहता विक्रोळी पूल नागरिकांसाठी खुला करण्याचे आदेश मुख्‍यमंत्री फडणवीस यांनी महानगरपालिका प्रशासनास दिले आहेत. मुख्‍यमंत्री महोदयांसह उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्‍यमंत्री अजितदादा पवार यांच्‍या संमतीने महानगरपालिकेला प्राप्‍त झालेल्‍या या आदेशानुसार, शनिवार, १४ जून २०२५ सायंकाळी ४ वाजेपासून विक्रोळी पूल वाहतुकीस खुला केला जाणार आहे.

महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्‍या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांच्‍या नेतृत्‍वाखाली विक्रोळी उड्डाणपुलाची उभारणी विहित कालमर्यादेत म्‍हणजेच ३१ मे २०२५ रोजी पूर्ण करण्‍यात आली आहे. पूर्व उपनगरातील विक्रोळी येथील रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या उड्डाणपुलामुळे पूर्व – पश्चिम बाजू जोडली जाणार आहे. या पुलामुळे विक्रोळी पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि विक्रोळी पूर्व बाजूस पूर्व द्रुतगती महामार्ग जोडले जाणार आहेत. परिणामी, प्रवास वेळेत सुमारे ३० मिनिटांची बचत होणार आहे.

महानगरपालिकेच्या पूल विभागाच्या समन्वयाने विक्रोळी पुलाची उभारणी, स्थापत्य कामे व अनुषंगिक कामे देखील पूर्ण झाली आहेत. विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर उभारण्यात आलेल्या पुलाची एकूण रुंदी १२ मीटर तर लांबी ६१५ मीटर इतकी आहे. त्यापैकी ५६५ मीटरची उभारणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने केली आहे. तसेच उर्वरित ५० मीटर लांबीपर्यंतची उभारणी मध्ये रेल्वेकडून करण्यात आली आहे. रेल्वे विभागाकडून एकूण ७ तुळया स्थापित करण्यात आल्या असून त्यांचे एकूण वजन ६५५ टन आहे. या पुलावर महानगरपालिकेने टाकलेल्या तुळया सुमारे २१४२ टन इतक्या वजनाच्या आहेत. तसेच या तुळयांची लांबी २५ ते ३० मीटर इतकी आहे. पुलाच्या तीन टप्प्यांत एकूण १८ तुळया टाकण्यात आल्या आहेत.

या पुलाच्या एकूण १९ स्तंभांपैकी पूर्वकडील बाजूस १२ तर पश्चिमेकडील बाजूस ७ स्तंभ उभारले आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूचे पोहोच रस्ते (Approach Roads), मार्गिकांवरील कॉंक्रिट, मास्टिक, ध्वनी रोधक, अपघातरोधक अडथळा (Anti Crash Barriers), रंगकाम आणि मार्ग रेषा आखणी आदी सर्व कामे पूर्ण होऊन पूल वाहतुकीसाठी उपलब्‍ध झाला आहे. महानगरपालिकेच्‍या रस्ते आणि वाहतूक विभागाने पश्चिमेकडील बाजूवर वाहतूक थांबा क्षेत्र (Bay) तयार केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *