
मुंबई :
विक्रोळी येथील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा घाईगडबडीत करण्यात आला. केवळ श्रेय घेण्यासाठी भाजपने या ठिकाणी स्टंटबाजी केली. उड्डाणपुल सुरु झाल्याने विक्रोळी पुर्वेला वाहतूक कोंडीची समस्या वाढली असून याकडे कोणालाही लक्ष द्यायला वेळ नाही. याबाबत खासदार संजय दिना पाटील यांनी वाहतूक विभाग तसेच महानगर पालिकेला पत्राव्दारे वारंवार कळविले आहे. मात्र पालिका प्रशासनाने त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. परिणामी उड्डाणपुल झाल्यानतर पुर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोडी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्यांच्यासाठी हा पुल आता डोकेदुखी ठरत आहे.
विक्रोळी येथील उड्डाणपुल झाल्यानंतर नागरीकांच्या वेळेत आणि पैशात बचत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र उड्डाणपुल झाल्यानंतर पश्चिमेकडून पूर्वेला आल्यानंतर टागोर नगर, पूर्व दुतगती महामार्गावर रस्ता अरुंद असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाचे घाईघाईने उद्घाटन करण्याऐवजी लोकांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे नागरीकाचे म्हणणे आहे. दरम्यान हा उड्डाणपुल नसताना या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्यामुळे यावर तोडगा काढण्यात यावा, यासाठी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी वाहतक विभाग आणि पालिकेशी वारंवार पत्रव्यवहार करुन या समस्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासनाने या समस्यांना गांभीर्याने घेतले नाही, स्थानिक नागरीकांच्या समस्याकडे लक्ष देण्याऐवजी पुलाचे उदघाटन करुन श्रेय घेण्यासाठी भाजपने स्टंटबाजी केल्याने नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत विक्रोळीकर विकास मंचाने वाहतुक विभागाकडे तक्रार केली असून टागोर नगर आणि कन्नमवार नगर या दोन्ही मार्गावर रस्ता दुभाजक लावण्यात यावा, किमान ६ वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात यावी, टागोर नगरला जाणारी वाहतुक रेल्वे स्टेशन मार्गे टागोर नगरला वळविण्यात यावी, जड वाहनांना या पुलावरुन येण्यास बंदी घालण्यात यावी. नवीन पुलाच्या खाली पूर्व दुतगती मार्गावर सिग्नल लावण्यात यावा, या मागण्या स्थानिक नागरीकानी आपल्या पत्रात केल्या आहेत.