
मुंबई :
गेली अनेक वर्षे सातत्याने तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला येत्या ४ वर्षात फायद्यात आणण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते एस टी महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका प्रसिद्ध करताना बोलत होते. यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ . माधव कुसेकर तसेच सर्व खात्याचे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले, गेल्या ४५ वर्षांमध्ये केवळ ८ वर्ष एसटी महामंडळ चालनिय नफ्यात होते. राज्यातील तब्बल ९० % लोकसंख्येला थेट परिवहन सेवा देणारी एसटी ही महाराष्ट्राची ” लोकवाहिनी ” आहे. दररोज सुमारे ५५ लाख प्रवाशांना सुरक्षित दळणवळण सेवा देणारी एसटी भविष्यात आर्थिक दृष्ट्या सक्षम असणे, ही काळाची गरज आहे.
सन २०१८-१९ मध्ये एसटीचा संचित तोटा सुमारे ४६०० कोटी होता. परंतु, करोना महामारीच्या काळात टाळेबंदी मुळे व नंतर चालेल्या कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन संपामुळे तो संचित तोटा आता १०३२२ कोटी पर्यंत पोहोचला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची देणे सुमारे ३००० कोटी पर्यंत आहेत. अर्थात, यासाठी शासनाने अनुदान स्वरूपात एस टी महामंडळाला मदत करणे अत्यंत आवश्यक असून एसटीची आर्थिक गाडी रुळावर आणण्यासाठी मंत्री म्हणून मी शासन दरबारी निश्चितच यासाठी पाठपुरावा करेन अशी ग्वाही प्रताप सरनाईक यांनी दिली.
तथापि, एसटीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील संस्थेचा आर्थिक तोटा कमी करण्यासाठी आपल्या कामाची उत्पादकता वाढवणे आणि योग्य ठिकाणी काटकसर करून बचत करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.
एस.टी. तेथे एसटी
डोंगरदऱ्यात व दुर्गम भागात राहणाऱ्या आमच्या आदिवासी बांधवांसाठी (शेड्युल ट्राईब एस.टी.) लवकरच थेट एसटी सेवा सुरू करण्याचा आम्ही संकल्प सोडला असून जिथे केवळ रस्ता अरुंद असल्यामुळे आमच्या ११ मीटर व १२ मीटर च्या मोठ्या बसेस पोहोचू शकत नाहीत. तिथं खास ५० मिनी बसेस आम्ही घेणार आहोत. या मिनी बसेस चालवणे एसटीच्या दृष्टीने तोट्याचे असले तरी आदिवासी बांधवांसाठी तो तोटा सहन करून आम्ही त्यांना प्रवासी सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.