
मुंबई :
अकरावी प्रवेश प्रक्रियेला होत असलेल्या विलंबामुळे विद्यार्थी हतबल झाले असताना आता पहिली गुणवत्ता यादी पुन्हा लांबणीवर पडणार आहे. २६ जून रोजी जाहीर करण्यात येणारी पहिली गुणवत्ता यादी ही चार ते पाच दिवस विलंबाने जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष कोलमडणार असल्याने विद्यार्थी व पालकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला दरवर्षी विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. विद्यार्थ्यांचे होणार नुकसान लक्षात घेता यंदा राज्य मंडळाने दहावीचे निकाल जवळपास १५ दिवस लवकर जाहीर केले. मात्र पहिल्या दिवसांपासून निर्माण होत असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे प्रवेश प्रक्रियेचा पुरता बोजवारा उडाला आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या सुरुवातीला निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. याच तांत्रिक अडचणीमुळे १० जून रोजी जाहीर होणारी पहिली गुणवत्ता यादी ही २६ जून रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष २६ जून रोजी लागणाऱ्या पहिल्या गुणवत्ता यादीकडे लागले होते. मात्र अल्पसंख्याक कोट्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या नव्या शासन निर्णयानुसार संकेतस्थळामध्ये काही बदल करावे लागणार आहेत. हे बदल करण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे २६ जून रोजी जाहीर करण्यात येणारी पहिली गुणवत्ता चार ते पाच दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण संचालक महेश पालकर यांनी सांगितले.
दरम्यान अकरावी प्रवेश बाबत गुणवतेनुसार कॉलेजस आलोटमेंट बाबत सविस्तर बाबी गुरुवारी दुपारी जाहीर होणार आहेत. त्यामुळे पालकांनी व विद्यार्थी यांनी काळजी करू नये. असे शिक्षण संचालनालाय माध्यमिक व उच्च माध्यमिक कडून कळविण्यात आले आहे.
अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी लांबणीवर पडल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शालेय शिक्षण विभागाने अकरावीचे वर्ग १ जुलैपासून सुरू करण्याची मुभा कनिष्ठ महाविद्यालयांना दिली होती. मात्र शिक्षण संचालनालयाच्या भोंगळ कारभारामुळे पहिली गुणवत्ता यादीच १ जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रिया कशी लांबली
अकरावी प्रवेश प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर २१ मेपासून अर्ज नोंदणीला सुरुवात करण्यात येणार होती. मात्र पहिल्याच दिवशी उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीमुळे अर्ज नोंदणी प्रक्रिया २६ मे पासून सुरुवात करण्यात आली. मात्र तांत्रिक अडचणी कायम राहिल्याने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यात वारंवार समस्या येत होती. यावर मात करत अखेर ७ जून रोजी ऑनलाईन अर्ज नोंदणी पूर्ण झाली. परंतु तांत्रिक अडचणीचे शुक्लकाष्ठ कायम राहिल्याने १० जून रोजी जाहीर होणारी पहिली गुणत्तवा यादी लांबणीवर टाकण्यात आली. शिक्षण संचालनालयाने नव्याने वेळापत्रकानुसार जाहीर करून पहिली गुणवत्ता यादी १० जूनऐवजी २६ जून रोजी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आता पुन्हा पहिली गुणवत्ता यादी लांबणीवर पडली आहे.