
मुंबई :
राज्य शासनाचा अंगीकृत सार्वजनिक उपक्रम असलेली असलेली एसटी सुमारे ८३ हजार कर्मचाऱ्यांची “मातृसंस्था” आहे. भविष्यात एसटीचे कदापि खाजगीकरण होणार नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे नि:संदिग्ध प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. मुंबईतील परळ बसस्थानकामध्ये कामगार नेते भाई जगताप यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांच्या पुढाकाराने कर्मचारी व प्रवाशांसाठी जलशितकाचे लोकार्पण ( water purifier & cooler) करताना मंत्री सरनाईक बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे, प्रादेशिक व्यवस्थापक यामिनी जोशी, विभाग नियंत्रक अभिजीत पाटील, वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी संतोष शेगोकर, विभागीय वाहतूक अधिकारी अमित गिरमे, आगार व्यवस्थापक नितीन चव्हाण, कर्मचारी काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप जगताप, शेखर कोठावळे, संतोष गायकवाड, दीपक म्हात्रे, संदीप गोसावी, दत्ता चव्हाण, सचिन जगताप, गणेश निकम यांच्या सह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा : देशभरातील गुणवंत विद्यार्थ्यांची ‘श्रुजन’ इंटर्नशिप उपक्रमांतर्गत मुंबई विद्यापीठास भेट
मंत्री सरनाईक म्हणाले, एसटीचा कर्मचारी अत्यंत मेहनती आहे. तो काम करीत असलेल्या ठिकाणी त्याला मुलभूत सोयी – सुविधा पुरविणे ही एसटी प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे चालक-वाहक विश्रांती गृह, तेथील प्रसाधनगृह स्वच्छ असली पाहिजेत. त्यासाठी आपण खाजगी स्वच्छता संस्था नेमत असून, त्यांच्याकडून विश्रांतीगृहाच्या स्वच्छतेबरोबर कर्मचाऱ्यांचे गणवेश स्वच्छ धुवून इस्त्री करून कर्मचाऱ्यांना देण्याबाबत व्यवस्था करण्यात येईल. कर्मचाऱ्यांच्या मुलभूत गरजाकडे अशा प्रकारे लक्ष दिल्यास त्यांना आपली कामगिरी करणाऱ्यांसाठी अनुकूल मानसिक परिस्थिती निर्माण करणे शक्य होते. अर्थात, याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये होऊन त्यांची उत्पादकता वाढण्यास मदत होईल. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.