
मुंबई :
गणेशोत्सवानिमित्त मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांनी प्रवासासाठी एसटीला उदंड प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे एसटीच्या ४ हजार ४७९ बसेस गट आरक्षणासह एकूण ५ हजार १०३ जादा बसेस आतापर्यंत फुल्ल झाल्या आहेत.
मुंबईतील कोणवासीयांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान ५ हजार २०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत देण्यात येत आहे. २३ ऑगस्ट पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
हेही वाचा : कृत्रिम तलावाच्या विरोधात अष्टविनायक चौक परिसरातील नागरिकांमध्ये वाढता रोष
गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या काळात एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.