
मुंबई :
भारतात ४ जून २०२५ पर्यंत ४ हजार ३०२ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे, गेल्या २४ तासांत ८६४ रुग्णांची वाढ झाली आहे. बहुतेक रुग्ण सौम्य आहेत आणि घरीच उपचार केले जात आहेत. १ जानेवारी २०२५ पासून, ४४ मृत्यूची नोंद झाली आहे.
भारतात करोना रुग्णांच्या संख्येत वाढ असल्याने आरोग्य सेवा महासंचालक डॉ. सुनीता शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन कक्ष, आपत्कालीन व्यवस्थापन प्रतिसाद कक्ष, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम आणि दिल्लीतील केंद्र सरकारी रुग्णालये आणि सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींसह तांत्रिक आढावा बैठका घेण्यात आली. या बैठकीमध्ये करोना परिस्थिती आणि तयारीच्या उपाययोजनांचे मूल्यांकन करण्यात आले. त्यानुसार राज्यांना ऑक्सिजन, विलगीकरण खाटा, जीवनरक्षक प्रणाली आणि आवश्यक औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे ऑक्सिजन पुरवठा प्रणालीचे मूल्यांकन करणारा मॉक ड्रिल आयोजित करण्यात आला होते. मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व दाखल झालेल्या गंभीर तीव्र श्वसन आजार (एसएआरआय) रुग्णांसाठी आणि ५ टक्के इन्फ्लूएंझा सदृश आजार (आयएलआय) रुग्णांसाठी चाचणी करण्याची शिफारस केली जात आहे.
महाराष्ट्रात १७ जणांचा मृत्यू
राज्यात दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, बुधवारी राज्यामध्ये १०५ नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच करोनामुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १७ वर पोहोचली आहे. १ ते ४ जून या कालावधीत राज्यात पाच जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. राज्यामध्ये रविवारी सापडलेल्या १०५ रुग्णांमध्ये पुणे महानगरपालिका ३३ रुग्ण, मुंबईमध्ये ३२ रुग्ण, ठाणे महानगरपालिका १४ रुग्ण, नवी मुंबई महानगरपालिका ९, सातारा ५, पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका ४, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, ठाणे जिल्हा आणि नागपूर महानगरपालिकेमध्ये प्रत्येकी १ रुग्ण सापडला आहे. राज्यातील करोना रुग्णांची संख्या १ हजार ६४ इतकी झाली आहे, तर मुंबईतील रुग्णांची संख्या ५४१ इतकी झाली आहे. तसेच बुधवारी राज्यामध्ये तीन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या १७ वर पोहचली आहे. जानेवारी २०२५ पासून राज्यात एकूण १३ हजार ७०७ करोना चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी १ हजार ६४ जण बाधित आढळले. आतापर्यंत ५२१ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, ५२६ रुग्ण सक्रिय आहेत. सध्या असलेल्या सक्रिय रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच उपचार घेत आहेत.