
मुंबई :
स्वच्छ मुंबईसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरात शाळा आणि मैदानांसाठी विशेष स्वच्छता मोहीम राबवली होती. ७ एप्रिल २०२५ पासून सुरू झालेली ही मोहीम आझाद मैदान, शिवाजी पार्क आणि ओव्हल मैदान या जागांसह महापालिका, सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये घेतली गेली होती. ९ दिवस राबवण्यात आलेल्या या मोहिमेत परिसरातील स्वच्छता, पार्किंगची जागा, कचरा गोळा करण्याच्या जागा आणि पदपथ यांचा समावेश होता.
या मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि साधनसामग्री पुरवण्यात आली होती. एकूण ९२८९ कर्मचारी, ५९ जेसीबी, ८९ डंपर्स आणि १२४ लिटर पिकर्स यांसारखे आधुनिक तंत्रज्ञान वापरले गेले. याशिवाय ५००० लिटर क्षमतेचे ७२ वॉटर टँकर्स आणि २६७ लहान कचरा संकलन वाहने (SCVs) वापरण्यात आली. ज्यामुळे साफसफाई अधिक प्रभावीपणे केली गेली.
या मोहिमेचा परिणाम हे केलेल्या प्रयत्नांची स्पष्ट साक्ष देतो. एकूण १३७.०५ टन कचरा, ६६.९ टन विविध सामान आणि ७१.४८ टन बांधकामाचा मलबा जमा करण्यात आला, ज्यामुळे २५७ शाळांमध्ये आणि त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता आणि पर्यावरणात लक्षणीय सुधारणा झाली. ही मोहिम ठराविक कार्यप्रणाली (SOP)चे पालन करून राबवण्यात आली होती.
विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माण सोसायट्या आणि नागरिकांनाही या मोहिमेत सहभागी झाले होते. नागरिकांच्या सहकार्याने एखादी मोहीम कशी यशस्वी करावी याचे उत्तम उदाहरण म्हणून सदर शाळा सफाई अभियान लक्षात घेता येईल. या मोहिमेद्वारे नियोजनपूर्वक आणि सामूहिक प्रयत्नांनी BMC च्या घनकचरा विभागाने स्वच्छ मुंबईसाठी आपली तत्परता पुन्हा एकदा सिद्ध केली.