
मुंबई :
एसटी महामंडळ (ST Corporation) गेले अनेक वर्ष आर्थिक अडचणीत असून आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी, तसेच त्यावर अभ्यास करून मार्ग काढण्यासाठी आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका तयार करावी, अशी मागणी आम्ही गेले २५ वर्ष करीत आहोत. श्वेत पत्रिका काढणे हा निर्णय आर्थिक संकटात सापडलेल्या महामंडळाच्या दृष्टीने मार्ग काढण्यासाठी खरोखरच चांगला आहे. यामुळे चित्र स्पष्ट होऊन कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी सोपे होणार असल्याचे मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले आहे.
एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर श्वेत पत्रिका काढण्याचे निर्देश काल महामंडळाच्या खाते प्रमुखांच्या सोबत झालेल्या आढावा बैठकीत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले. त्यावर प्रतिक्रिया देताना बरगे यांनी म्हटले आहे की, १० हजार कोटी रुपयांचा संचित तोटा व ७ हजार कोटी रुपयांची कर्मचाऱ्यांची व महामंडळासमोर असलेली थकीत देणी यावर मार्ग काढण्याच्या दृष्टीने व भविष्यासाठी हा निर्णय क्रांतिकारी ठरेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे.
एसटी महामंडळाला दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी करावी लागणारी कसरत, वाहन खरेदी, टायर खरेदी, इंधन खरेदी, स्थानकाचे नूतनीकरण व इतर आस्थापना खर्चासाठी सुद्धा प्रशासनाची दर महिन्याला आर्थिक ससेहोलपट होत आहे. कर्मचाऱ्यांची देणी, भविष्य निर्वाह निधीचे हप्ते न भरणे, कामगार वेतनवाढ फरक, महागाई भत्ता फरक रक्कम, घरभाडे भत्ता फरक रक्कम,व प्रलंबित देणी यासाठी महामंडळाला निधीची गरज आहे.
याबरोबरच महामंडळाला इंधन, वस्तू व सेवा पुरविणाऱ्या संस्थांची थकीत देणी या सर्व घटकांचा विचार करून एसटी महामंडळाचे सध्याचे उत्पन्न व याचा ताळमेळ घालून लेखा-जोखा मांडणे गरजेचे होते. त्याला या निर्णयाने बळकटी मिळेल असेही बरगे यांनी म्हटले आहे.
माजी महापौर दत्ता दळवी यांचा शिवसेनेत प्रवेश; शिवसेनेचा पुन्हा एकदा उबाठा गटाला झटका
सल्लागार नेमण्याची संकल्पना चांगली
भाडेवाढ होऊनही अपेक्षित उत्पन्न व प्रवासी संख्येत वाढ करण्यात एसटी प्रशासन सपसेल अपयशी ठरल्याचे दिसत असून कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्याच प्रमाणे वेगवेगळ्या संकल्पना व ब्रँड आणून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी व इतरही बाबतीत सुद्धा नवनवीन योजना तयार करण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ञांच्या सल्ल्याची या परिस्थितीत गरज असून परिवहन मंत्र्यांचा हा निर्णय सुद्धा स्वागतार्ह असल्याचे बरगे यांनी म्हटले आहे.