शहर

कांजूरमार्ग आणि देवनार डम्पिंग ग्राऊंड बंद करणार – मिहिर कोटेचा

आम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला आपला धर्म मानतो पण विरोधक संविधानावर विश्वास ठेवत नाहीत

मुंबई :

मुलुंडचे आमदार आणि भाजप-महायुतीचे ईशान्य मुंबई लोकसभेचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी आज विक्रोळी भांडुपमध्ये मराठी सांस्कृतिक केंद्र उभारणार, मुलुंडमध्ये रेल्वे टर्मिनस सुरू करणार आणि कांजूरमार्ग आणि देवनार डम्पिंग ग्राऊंड बंद करणार असल्याचे म्हणाले. आम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला आपला धर्म मानतो पण विरोधक संविधानावर विश्वास ठेवत नाहीत आणि दगडफेक करत आहेत, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र दिनानिमित्त बुधवारी संध्याकाळी कोटेचा यांनी त्यांचे पॉडकास्ट मराठीत लाँच केले. घाटकोपर (पश्चिम) मधील भटवाडी येथील समाज कल्याण केंद्रात ते प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांच्याशी संवाद साधत होते. सध्या भांडुप आणि विक्रोळी परिसरात एकही नाट्यगृह नाही. मराठी नाटक, कला आणि संस्कृती दाखवण्यासाठी या भागात चांगले सभागृह नाही. मराठी लोकांसाठी कला आणि सांस्कृतिक केंद्र बांधण्याचा माझा मानस आहे जेणेकरून स्थानिक मराठी लोकांना त्यांच्या कलेचा आणि संस्कृतीचा आस्वाद आसपासच्या परिसरातच घेता येईल, असे कोटेचा यांनी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर आपल्या प्राधान्यांविषयी बोलताना सांगितले.

कोटेचा यांनी मुलुंडमध्ये रेल्वे टर्मिनस उभारण्याबाबत भूमिका मांडली. घाटकोपर ते मुलुंड दरम्यान कोकणातील लोक मोठ्या संख्येने राहतात. पहाटेची ट्रेन पकडण्यासाठी त्यांना रात्री दिवा स्थानक गाठावे लागत असल्याने कोकणात जाण्यासाठी त्यांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे मुलुंडमध्ये रेल्वे टर्मिनस बांधण्याचा प्रस्ताव असून पहिली ट्रेन कोकणात जाईल, असे कोटेचा पुढे म्हणाले.

कोटेचा पुढे म्हणाले की, दोन्ही डम्पिंग ग्राऊंड स्थलांतरित करण्यासाठी आपण काम करणार आहोत. देवनार आणि कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राउंड अजूनही सुरू आहेत. त्यांचे करार २०२५ मध्ये नूतनीकरणासाठी आहेत. निवडून आल्यानंतर, मी कोणत्याही परिस्थितीत नूतनीकरण होऊ देणार नाही. त्यासाठी बीएमसीच्या भूखंडावर हे डंपिंग ग्राउंड तळोजा येथे हलवण्याचे काम करेन. मी मुंबई डम्पिंग ग्राऊंडमुक्त करेन, असेही त्यांनी पुढे सांगितले.

प्रचाररथावर झालेल्या दगडफेकीच्या मुद्द्यावर कोटेचा म्हणाले की, मानखुर्द हे गुटखा आणि अंमली पदार्थांसह अवैध कामांचे केंद्र बनले आहे. मी निवडून आल्यानंतर हे सर्व अवैध धंदे बंद करेन. आम्ही हुकूमशाही आणू, असा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे, पण प्रत्यक्षात विरोधक हुकुमशाही पद्धतीने वागत आहेत. विरोधकांना आम्ही तिथे प्रचार करू नये असे वाटते त्यामुळे ते दगडफेकीसारखे प्रकार अवलंबत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला आम्ही आमचा धर्म मानतो, मात्र विरोधकांचा बाबासाहेबांच्या संविधानावर विश्वास नाही, असेही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *