
मुंबई :
राज्य मंडळाने जाहीर केलेल्या बारावीच्या निकालामध्ये कोकण विभागाने बाजी मारली असली तरी मुंबई विभागातील विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविण्यामध्ये बाजी मारली आहे. मुंबईतून ४२ हजार ४८१ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण म्हणजेच प्रावीण्यासह प्रथम श्रेणी मिळवली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये मुंबई विभागातून ३ लाख १५ हजार ११८ विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंदणी केली होती. त्यातील ३ लाख १४ हजार १४४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी २ लाख ९१ हजार ९५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यातील ४२ हजार ४८१ विद्यार्थी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण म्हणजेच प्रावीण्यासह प्रथम श्रेणी मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. त्याखालोखाल छत्रपती संभाजी नगरमधील २६ हजार ८३२ विद्यार्थी आणि नाशिकमधील २१ हजार १०५ विद्यार्थी यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. तर शिक्षणाचे माहेर घर समजल्या जाणाऱ्या पुण्यातील विद्यार्थी हे प्रावीण्यासह प्रथम श्रेणी मिळवण्यामध्ये चौथ्या क्रमांकावर आहेत. पुण्यातील १९ हजार २४३ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. त्याचप्रमाणे अमरावतीमधील १८ हजार ६३९ विद्यार्थ्यांनी, नागपूरमधील ७ हजार ९५५ विद्यार्थी, लातूरमधील ६ हजार २९२ विद्यार्थी, कोल्हापूरमधील ५ हजार ८२६ विद्यार्थी आणि कोकण विभागातील १ हजार ५५९ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.
सर्वाधिक कमी निकाल लागलेल्या लातूरमधील (८९.४६ टक्के) ६ हजार २९२ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवल्याने हुशार मुलांच्या यादीत लातूरने सातवा क्रमांक पटकावला आहे.
गतवर्षीच्या तुलनेने यंदा घट
७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुंबईच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली असली तरी गतवर्षीच्या तुलनेत यंदा घट झाली आहे. यंदा ४२ हजार ४८१ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. तर गतवर्षी ४५ हजार ९७२ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले होते.