मुख्य बातम्याशिक्षण

बारावीचा निकालात पुन्हा कोकणची बाजी; ९१. ८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

मुंबई :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. यंदा बारावीचा निकाल ९१.८८ टक्के लागला. यामध्ये दरवर्षीप्रमाणे मुलींनी बाजी मारली आहे. तसेच राज्यामध्य कोकण विभाग पुन्हा अव्वल ठरला असून, लातूर पॅटर्न यंदा अपयशी ठरला आहे.

राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळातून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेसाठी यंदा १४ लाख २७ हजार ८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १४ लाख १७ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील १३ लाख २ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांचे प्रमाण हे ९१.८८ टक्के इतके आहे. यामध्ये मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण८९.५१ टक्के तर मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९४.५८ टक्के आहे. राज्य मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने बाजी माारली असून, कोकण विभागाचा निकाल ९६.७४ टक्के इतका लागला आहे. राज्य मंडळाने ५४ विषयांसाठी घेतलेल्या या परीक्षेमध्ये ३७ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत निकालात घट

राज्य मंडळाकडून घेण्यत आलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेचा निकाल यंदा ९१.८८ टक्के लागला आहे. मात्र गतवर्षीच्या निकालात यंदा १.४९ टक्के घट झाली आहे. गतवर्षी बारावीचा निकाल ९३.३७ टक्के इतका लागला होता. त्याचप्रमाणे २०२२ मध्ये ९४.२२ टक्के तर २०२३ मध्ये ९१.२५ टक्के इतका लागला होता.

कोठे पाहाल निकाल

१. https://results.digilocker.gov.in

२. https://mahahsscboard.in

३. http://hscresult.mkcl.org

४. https://results.targetpublications.org

५. https://results.navneet.com

६. https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams

७. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hsc-12-results

८. https://www.indiatoday.in/education-today/results

९. https://www.aajtak.in/education/board-exam-results

विभागनिहाय निकालाची टक्केवारी

  • कोकण -९६.७४
  • कोल्हापूर ९३.६४
    मुंबई – ९२.९३
  • संभाजीनगर – ९२.२४
  • अमरावती – ९१.४३
  • पुणे -९१.३२
  • नाशिक -९१.३१
  • नागपूर – ९०.५२
  • लातूर – ८९.४६

गुणपडताळणी, छायाप्रतीसाठी २० मेपर्यंत करता येणार अर्ज

ऑनलाईन निकालानंतर इयत्ता बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahahsscboard.in वरुन स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी ६ ते २० मे २०२५ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. तसेच छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्तीसाठी विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार आहे.

श्रेणी/गुणसुधारण्यासाठी तीन संधी

फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी श्रेणी/गुणसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील. जून-जुलै २०२५, फेब्रुवारी-मार्च २०२६ व जून-जुलै २०२६ या तीन परीक्षांमधून ही संधी उपलब्ध असणार आहे.

पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधारसाठी ७ मेपासून अर्ज उपलब्ध

जून-जुलै २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार व खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ७ मे २०२५ पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *