आरोग्य

उन्हाच्या तडाख्याने मुंबईकर हैराण

उन्हामध्ये सातत्याने काम केल्याने शरीरातील तापमान नियंत्रित करण्याच्या यंत्रणेत बिघाड होतो.

मुंबई :

मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे दुपारनंतर बाहेर फिरताना नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा बाहेर पडत आहेत. हा वाढता उकाडा नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. उन्हामध्ये सातत्याने काम केल्याने शरीरातील तापमान नियंत्रित करण्याच्या यंत्रणेत बिघाड होतो. परिणामी शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे कोणत्याही सुरक्षेशिवाय उन्हामध्ये फिरल्यास उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता डॉक्टरांकडून वर्तविण्यात येत आहे.

एप्रिल व मे महिन्यांमध्ये उष्णता प्रचंड वाढत असल्याने नागरिकांना उलटी येणे, चक्कर येणे, निर्जलीकरण होणे, बेशुद्ध पडणे, उष्माघाताचा त्रास होत असतो. मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. उन्हामध्ये तापमान नियंत्रित ठेवणारी शरीरामध्ये एक यंत्रणा असते. या यंत्रणेचे कार्य विस्कळीत झाल्यास नागरिकांना उन्हाचा त्रास होतो. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यामध्ये शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणारी यंत्रणा सुरळीत चालू ठेवण्यासाठी सातत्याने पाण्याचे सेवन करणे आवश्यक असते. उष्णतेमुळे नागरिकांनी पुढील दिवसांमध्ये अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे सल्ला इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर ऑफ मेडिसिनचे मुंबई शाखेचे सचिव डॉ. भरत जगियासी यांनी दिला.

मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये उकाडा वाढत आहे. या वाढत्या उन्हामध्ये सातत्याने काम करणाऱ्या नागरिकांना डोकेदुखी, लघुशंका करताना जळजळ होणे, पोटात दुखणे, चक्कर येणे यासारखे त्रास हाेण्याची शक्यता आहे. अनेकदा शरीराचे निर्जलीकरणही होते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. दुपारच्या उन्हामध्ये घरातून बाहेर पडताना डोक्यावर टोपी, डोळ्यावर गॉगल्स यासारखी संरक्षक वस्तू वापराव्यात. तसेच सोबत पाण्याची बाटली ठेवावी, सतत पाणी पित राहत शरीराचे तापमान नियंत्रित ठेवावे, पाणीदार पदार्थ खाण्यावर भर देत अधिकाधिक फळे खाण्यात यावी, जेणेकरून वाढत्या उन्हाचा त्रास फारसा होणार नसल्याचे सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी सांगितले.

उन्हाच्या तडाख्यात थकवा येणे, गळून जाणे, चक्कर येणे, ताप येणे व पराकोटीच्या स्थितीत उष्माघात होणे, निर्जलीकरण होणे असे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे उन्हात कामाशिवाय बाहेर फिरू नये. उन्हात जायची वेळ आली तर डोक्यावर टोपी, पागोटे, दुपट्टा, पदर, रुमाल इत्यादी वापरून डोके झाकून घ्यावे. शक्य होईल तेव्हा व तितके सावलीत यावे. सुती, सैल कपडे घालावेत. सफेद कपडे उपयुक्त असतात. खूप घाम येत असेल तर त्या प्रमाणात पाण्याचे प्रमाण वाढवावे. उन्हाळ्यात पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. विशेषतः जे उन्हात फिरून काम करतात, शेती करतात, घराबाहेर शारीरिक श्रमाची कामे करतात, त्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. पाण्याव्यातिरिक्त ताक, पेज, लिंबू पाणी पिणे उपयुक्त ठरते, असे नायर रुग्णालयाच्या जनऔषध विभागाच्या प्रमुख डॉ. ऋजुता हाडये यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *