![](https://voiceofeastern.com/wp-content/uploads/2024/05/police-security.jpg)
मुंबई :
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये बंदोबस्त वाढविण्यात आला असून स्थिर व फिरत्या पथकांकडून मोठ्याप्रमाणात ठिकठिकाणी तपासणी सुरू आहे. तपासणी प्रक्रियेत प्रत्येकाने सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
निवडणूक काळात नागरिकांनी व्यापाऱ्यांनी, व्यावसायिकांनी कोणतेही साहित्य, रक्कमांसोबत ठेवतांना त्यासंदर्भाचे योग्य दस्तऐवज सोबत ठेवावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये कडेकोट बंदोबस्त करण्यात आला असून दाखल झालेले निवडणूक निरीक्षक तपासणी संदर्भात जागरूक असून जिल्ह्यातील जप्ती प्रकरणातील आढावा घेण्यात येत आहे. निवडणूक काळात वाहनाची कसून तपासणी होत असून दररोज हा अहवाल निवडणूक विभागाला सादर केला जात असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली आहे.
विविध यंत्रणांकडून तपासणी
लोकसभा निवडणुकीदरम्यान कोणत्याही परिस्थितीत पैशांचा गैरवापर, मद्याचा मोफत पुरवठा, भेट वस्तूंचे वाटप, किंवा कोणतेही आमिष दिले जाऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनासह इन्कमटॅक्स, राज्य उत्पादन शुल्क, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर, राज्य वस्तू आणि सेवा कर, व्यावसायिक कर,अमली पदार्थ नियंत्रण दल, सीमा सुरक्षा दल, सशस्त्र सीमा दल, पोलीस दल केंद्रीय, औद्योगिक सुरक्षा दल, भारतीय किनारा दल, रेल्वे संरक्षण दल, पोस्ट विभाग, वन विभाग, नागरी उडुयन विभाग, विमानतळ प्राधिकरण, राज्य नागरी विमान वाहतूक विभाग, राज्य परिवहन विभाग, यांच्यासह विमुक्त फिरते पथक (एफएसटी) स्टॅटिक सर्विलन्स टीम (एसएसटी) कार्यरत आहेत.